श्रीक्षेत्र माहूर, इलियास बावानी | माहूर गडावर सुरू असलेल्या नवरात्र महोत्सवात लाखो भाविक दर्शनासाठी दाखल झाले आहेत. यात्रेदरम्यान भाविकांच्या सुविधेसह सुरक्षेला प्राधान्य देत पोलिसांनी काटेकोर बंदोबस्त लावला असून, आतापर्यंत एकही अपघात, पाकीटमारी किंवा छेडछाडीची घटना न घडल्याने पोलीस निरीक्षक गणेश कराड यांच्या नियोजनाचे कौतुक होत आहे.


दरवर्षीप्रमाणे यंदाही गडावर श्री रेणुका मातेसह विविध देवस्थानांच्या दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी होत आहे. गडावर सुरू असलेल्या लिफ्ट व स्कायवॉकच्या कामामुळे दर्शन पायऱ्यांवर दुहेरी ऐवजी एकेरी वाहतूक ठेवण्यात आली आहे. भाविकांना परतीसाठी परशुराम मंदिराच्या मार्गाने नवीन पायऱ्या तयार करून देण्यात आल्या असून, ही कामगिरी केवळ दोन दिवसांत पूर्ण केल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता डी. के. भिसे यांचे कौतुक होत आहे. पायऱ्यांवर प्रत्येक काही अंतरावर पोलीस तैनात असल्याने भाविकांचे दर्शन सुरळीत पार पडत आहे. तहसीलदार अभिजीत जगताप यांच्या उत्कृष्ट नियोजनाचाही उल्लेख होत आहे.


वरिष्ठांचे मार्गदर्शन घेत पोलीस निरीक्षक गणेश कराड यांनी माहूर गडावरील प्रत्येक संवेदनशील ठिकाणी कडक बंदोबस्त ठेवला आहे. विदर्भातील धनोडा आणि मराठवाड्यातील केरोळी येथील पैनगंगा नदी परिसरातही सुरक्षा तैनात करण्यात आली आहे.


एकूण 800 च्या जवळपास बंदोबस्त
पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी रामकृष्ण मळगणे यांच्यासह बिलोली, देगलूर, नांदेड ग्रामीण, धर्माबाद, भोकर आदी ठिकाणांहून आलेले अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत.
👉 8 पोलीस निरीक्षक
👉 29 सहाय्यक पोलीस निरीक्षक/उपनिरीक्षक
👉 320 पो.ना., पो.हे.का., पो.का.
👉 79 महिला पोलीस
👉 254 पुरुष होमगार्ड
👉 114 महिला होमगार्ड

असा एकूण जवळपास 800 जणांचा प्रचंड बंदोबस्त यात्रेसाठी लावण्यात आला आहे.
गडावरील प्रत्येक ठिकाणी नजर
केरोळी फाटा, ईदगाह, बालाजी मंगलम मातृतीर्थ, वसंतराव नाईक चौक, बसस्थानक, स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ, देवेश्वर मंदिर, महाकाली मंदिर, किल्ला, श्री दत्त शिखर संस्थान, कैलास टेकडी, श्री अनुसया माता संस्थान, परशुराम मंदिर परिसर, घाटातील पायऱ्या आदी ठिकाणी 24 तास पोलिसांचा कडक बंदोबस्त असल्याने भाविकांना रात्रीसुद्धा बिनधास्त दर्शन घेता येत आहे.
दरम्यान, गडावर जाणारी खासगी वाहने बंद करून सर्व भाविकांना एसटी बसद्वारेच प्रवास करावा लागत असल्याने वाहतुकीची शिस्त व सुरक्षिततेचा अनोखा संगम दिसून येत आहे. या उत्कृष्ट नियोजनामुळे पोलीस निरीक्षक गणेश कराड यांचे माहूरकरांसह भाविकांकडूनही अभिनंदन होत आहे.

