नांदेड l नांदेड जिल्ह्याचा अभिमान वाढवणारी बाब असून शाकुंतल स्कूल फॉर एक्सलन्समध्ये इयत्ता ९ वी मध्ये शिकणारी विद्यार्थिनी गायत्री वैजनाथ स्वामी हिला थेट देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजींनी स्वतःचे हस्ताक्षर असलेले शुभेच्छा व आशीर्वाद पत्र पाठवले आहे.


गायत्रीने रक्षाबंधनाच्या निमित्ताने स्वतःच्या हाताने सुंदर राखी तयार करून पंतप्रधानांना पाठवली होती. त्यासोबतच तिने सरकारच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध लोकहिताच्या योजनांविषयी सविस्तर पत्र लिहून त्या योजनांमुळे सामान्य जनतेला मिळणारा लाभ मनापासून व्यक्त केला होता.

गायत्रीचे हे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी स्वतः वाचले व तिच्या या निष्पाप भावनेला व देशहिताच्या जाणिवेला अभिनंदन व शुभेच्छा देत तिला पत्र पाठवले आहे. त्या पत्रामध्ये मोदीजींनी लिहिले आहे की, देशातील मुलींनी पुढाकार घेऊन यश संपादन केले पाहिजे, तसेच शासनाच्या योजनांचे केलेले कौतुक हे त्यांच्या दृष्टीने अभिमानाची बाब आहे.



फक्त शुभेच्छाच नव्हे तर आशीर्वादही देताना मोदीजींनी एका संस्कृत श्लोकाचा उल्लेख करून गायत्रीला प्रेरणादायी संदेश दिला आहे.

या अभूतपूर्व घटनेमुळे संपूर्ण शाकुंतल स्कूल फॉर एक्सलन्स, शिक्षकवर्ग, सहाध्यायी विद्यार्थी तसेच स्वामी परिवारामध्ये आनंद व अभिमानाचे वातावरण आहे. पालकांच्या डोळ्यात कौतुकाचे अश्रू आहेत तर शाळेतल्या शिक्षकांनी गायत्रीच्या या कार्याचा गौरव केला आहे.
आजवर लाखो पत्रे पंतप्रधानांकडे पोहोचली असली तरी गायत्रीचे पत्र विशेष ठरले कारण एका लहान मुलीने देशहिताच्या योजनांविषयी केलेले मनापासून कौतुक थेट देशाच्या पंतप्रधानांच्या हृदयाला भिडले.
ही घटना केवळ गायत्री व तिच्या परिवारासाठीच नव्हे तर संपूर्ण नांदेड जिल्ह्यासाठी आणि महाराष्ट्रासाठी अभिमानाची व प्रेरणादायी बाब ठरली आहे.

