बिलोली/नांदेड, गोविंद मुंडकर| बिलोली तालुक्यात दि. २७ ऑगस्टच्या मध्यरात्री पासून चालू असलेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील सर्वच नदी नाल्यांच्या पाणी पातळीत वाढ झालेली आहे. अशातच तेलंगानातील निजामसागर धरणातून सोडलेल्या २७ गेटमधील निसर्गाच्या पाण्यामुळे बिलोलीच्या सिमेवरुन वाहणाऱ्या मांजरा नदीला पुर आला आहे.


या पुरामुळे मांजरा व मन्याड नदी काठावर असलेल्या गावांसह हजारो हेक्टर क्षेत्रावरील पिकांची नासाडी झाली आहे. धोक्याच्या पातळीवरून वाहणा-या मांजरा नदीच्या पुर परिस्थिती बाबत खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने मांजरा व मन्याड नदी काठावरील काही गावातील नागरीकांना सुरक्षित स्थळी हलविले असून प्रशासन या पुर परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.


बिलोली तालुक्याच्या सिमेवरुन वाहणाऱ्या मांजरा व मन्याड नदी पात्राच्या पाणी पातळीत गेल्या दोन दिवसांत लक्षणीय वाढ झाली आहे. तेलंगणातील मांजरा नदी पात्रावर असलेल्या निजामसागर धरणांचे बरेचसे दरवाजे उघडण्यात आल्यामुळे मांजरा नदीच्या काठावरील गावांना या महापुराचा जास्तीचा फटका बसला असून मांजरा व मन्याड नदी काठावरी हिप्पारगा थडी, रामपूर थडी, सगरोळी, बोळेगाव, येसगी,कार्ला,गंजगाव, हुंनगुंदा,माचणूर आदी गावांना मोठा फटका बसला आहे. या पुरामुळे नदी काठावरील काही गावातील घरांमध्ये पाणी शिरल्याने बिलोली महसुल व पोलिस प्रशासनाने अशा नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले आहे.



या पुर परिस्थीतीवर महसूल व पोलीस प्रशासन लक्ष ठेवून आहे. तर दुसरीकडे देगलुर बिलोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार जितेश अंतापुरकर आणि माजी जिल्हा परिषद सदस्य बालाजी बच्चेवार यांनी बिलोली तालुक्यातील माजरा नदी काठावर असलेल्या काही गावांना भेट देऊन नागरीकांना आपल्या परिवारासह गुरा पोरांना सुरक्षित स्थळी राहण्याचे आवाहन केले आहे. मांजरा व मन्याड नदीला आलेल्या पुरामुळे बिलोली तालुक्यातील हजारो हेक्टर क्षेत्रावरील पिकांची मोठी नासाडी झाली.

या पुरामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.पुराचे पाणी घरात शिरलेल्या शेवाळा येथील दोनशे नागरीकांना स्थानिक प्रशासनाने हिप्परगा थडी येथील जिल्हा परिषद शाळेत स्थानांतरीत केले आहे. तर गंजगाव येथीलही काही कुटुंबांना शाळेत स्थानांतरीत करण्यात आले आहे.येसगी जुने गाव येथील नागरिकांनाही महसूल व पोलिस प्रशासनाने दि.28च्या रात्रीच सुरक्षित स्थळी स्थानांतरीत केल्यामुळे कोणतीही जिवीत हानी झाली नाही. आज घडीला येसगी जुने गाव हे पाण्याच्या विळख्यात सापडले आहे.

