नांदेड| नांदेड जिल्ह्यात 31 जुलैच्या सकाळी 6 वाजेपासून ते 14 ऑगस्ट 2025 च्या मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात 31 जुलैच्या सकाळी 6 वाजेपासून ते 14 ऑगस्ट 2025 च्या मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहिल.

त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश कामावरील पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही.


अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहतील.

शुक्रवारचा आठवडी बाजार बंद शुक्रवार ऐवजी शनिवारी भरणार आठवडी बाजार
नांदेड जिल्ह्यात व शहरात 1 ऑगस्ट 2025 रोजी दरवर्षीप्रमाणे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 105 वी जयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात येणार आहे. यादिवशी शुक्रवार येत असल्याने यादिवशी नांदेड शहरात भरणारा आठवडी बाजार शुक्रवार ऐवजी शनिवारी भरण्यात येणार आहे, कृपया शेतकरी, ग्राहक, व्यापारी यांनी नोंद घ्यावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
दर शुक्रवारी साठे चौक परिसर, व्हिआयपी रोड, महादेव दाल मिल ते आनंद नगर चौरस्ता रोड नं. 26 हमालपुरा, ईश्वरनगरकडे जाणारे रोडवर गोकुळनगर इत्यादी परिसरात मोठया प्रमाणात आठवडी बाजार भरत असतो व बाजारचे दिवशी मोठी वर्दळ असते. या शुक्रवारी भरणाऱ्या बाजारामुळे जयंती सोहळयास, मिरवणूका यांना अडथळा निर्माण होवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये यासाठी मार्केट अँड फेअर अँक्ट 1862 चे कलम 5 अन्वये 1 ऑगस्ट रोजी शुक्रवारी भरणारा आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी राहुल कर्डिले यांनी निर्गमित केले आहेत.

