नांदेड| नांदेड जिल्ह्याच्या विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी आपण लक्ष द्यावे आणि नांदेड जिल्ह्याचा सर्वांगीन , शाश्वत विकास व्हावा या अनुषंगाने खा. डॉ .अजित गोपछडे यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेऊन त्यांना साकडे घातले. (Fill the development backlog in Nanded district: Governor CP Radhakrishnan receives advice from Dr. Ajit Gopchhade) या भेटीत खा. डॉ .गोपछडे यांनी तब्बल आठ मागण्यांचे निवेदन सादर केले आहे.

नांदेड जिल्हा हा तेलंगणा, महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवर वसलेला जिल्हा आहे . नांदेड जिल्ह्याचा सर्वांगीण विकास व्हावा, रोजगार उपलब्ध व्हावा , नांदेडच्या नागरिकांना अत्याधुनिक सोयी सुविधा मिळाव्यात आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाहिलेल्या विकसित भारताच्या स्वप्नात नांदेडचा ही खारीचा वाटा असावा या हेतूने खा.डॉ. अजित गोपछडे यांनी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची मुंबईत आज भेट घेतली. या भेटीत त्यांनी राज्यपालांकडे नांदेड जिल्ह्यातील विकासाच्या विविध मागण्यांचे निवेदन सादर केले.

प्रामुख्याने नांदेड ते मुंबई व्यवसायिक विमानसेवा नियमितपणे सुरू करावी , लेंडी प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी आपल्या स्तरावरून आदेशित करत तेलंगणा सरकारचा सहभागी हिस्सा महाराष्ट्राला मिळवून देऊन नांदेड आणि तेलंगणामधील कृषी सिंचनाचा मोठा प्रश्न मार्गी लावावा , नांदेड जिल्ह्यातील गोरक्षण, संवर्धन। तसेच देशी गोवंश नस्लसुधार करुन भारतीय वंशाच्या गायीचे दूध उत्पादनात वाढ करण्याचे अनुषंगाने राष्ट्रीय गोकुळ मिशन योजनेस चालना द्यावी, जिल्हा परिषद हा ग्रामीण भागातील विकासाचा खरा पाया असतो . त्यामुळे नांदेड येथील अत्याआधुनिक असे नवे जिल्हा परिषद भवन उभारावे .


यासाठी आर्थिक तरतूद करण्याच्या अनुषंगाने आपल्या स्तरावरून राज्य सरकारला आदेशित करावे. देगलूर येथे भारतीय कृषी अनुसंधान परिषद आयसीएआर ची शाखा स्थापना करावी. बिलोली येथे सोयाबीन प्रक्रिया उद्योग उभारावा. बारड येथे केळी संशोधन केंद्र उभारून या भागातील केळी उत्पादकांना दिलासा द्यावा . धर्माबाद हा तालुका आणि शहर लाल मिरचीसाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे येथील लाल मिरचीचे संशोधन आणि संवर्धन करण्याच्या अनुषंगाने येथील मिरचीला जागतिक स्तरावरील बाजारपेठ करण्याच्या अनुषंगाने येथे मिरची संशोधन केंद्राची स्थापना करावी. त्यासाठी आर्थिक तरतूद करण्याचे अनुषंगाने राज्य सरकारला सूचित करावे .

नांदेड ते मुंबई नवी अतिरिक्त रेल्वे सुरू करावी . बाभळी बंधाऱ्याच्या पाण्याचे समन्यायी वाटप व्हावे जेणे करून महाराष्ट्रातील जनतेला विशेषतः धर्माबाद, बिलोली तालुक्यातील शेतकऱ्यांना या पाण्याचा पुरेपूर लाभ होऊन या भागातील कृषी क्षेत्राचे प्रश्न मार्गी लागतील. नांदेड देगलूर आणि शिरूर- ताजबंद – मुखेड- नरसी- बिलोली या राज्य महामार्गाचे राष्ट्रीय महामार्गात रूपांतर करून या रस्त्याच्या विकासासाठी केंद्रीय यंत्रणांमार्फत काम केले जावे. या अनुषंगाने आपल्या स्तरावरून संबंधित मंत्रालयाला आणि विभागाला आदेशित करावे. जेणेकरून नांदेड जिल्ह्याच्या विकासाचा अनुशेष भरून निघेल ज्यामुळे रोजगार आणि दळणवळणाच्या नवीन संधी उभ्या राहतील,महाराष्ट्राच्या आर्थिक विकासामध्ये नांदेड जिल्ह्याचे महत्त्वपूर्ण योगदान राहिल. अशी विनंती खा. डॉ. अजित गोपछडे यांनी राज्यपाल सी.पी . राधाकृष्णन यांच्याकडे केली आहे . दरम्यान राज्यपाल सी.पी राधाकृष्णन यांनी आपल्या ट्विटर वरून खा. डॉ. अजित गोपछडे यांच्या भेटीच्या आणि मागणीच्या संदर्भामध्ये सकारात्मक भूमिका विषद केली आहे.

