हिमायतनगर,अनिल मादसवार| यंदाचा खरीप हंगामवर्ष सुख समृद्धीचा होओ आणि घराघरात सुख समृद्धी नांदो… अशी प्रार्थना करून आषाढी एकादशी निमित्त शेकडो भाविकांनी विठ्ठल रुखमाई व श्री परमेश्वराचे दर्शन घेऊन पुण्यप्राप्त केले आहे. सायंकाळी ५ वाजता परंपरेनुसार शहरातील भजनी मंडळ व वारकरी महिला – पुरुष भक्तांनी टाळ – मृदंग आणि विठू नामाचा गजर करत (Devotees perform a ritual on the occasion of Ashadhi Ekadashi – circumambulate the city with the sound of the name Vithu accompanied by the Mridangam) भर पावसात वाढोणा शहराला नगरप्रदक्षिणा घालून विठुरायाच्या दर्शनासाठी पाई गेल्याचा आनंद घेतला आहे.


श्रीक्षेत्र दर्जा प्रपात झालेल्या हिमायतनगर (वाढोणा) येथील श्री परमेश्वर मंदिरात अनादिकालापासून आषाढी एकादशी उत्सव साजरा केला जातो आहे. त्या पार्श्वभूमीवर देवशयनी एकादशी रोज दिनांक ०६ रविवारी प्रति पंढरपूर म्हणून भगवान श्री परमेश्वर मंदिरात असलेल्या विठ्ठल रुख्माईचे दर्शन घेण्यासाठी वारकरी संप्रदायीक महिला – पुरुष भाविक भक्तांनी दर्शन घेण्यासाठी सकाळपासून गर्दी केली होती. सकाळी सहा वाजता पुरोहित कांतागुरु वळले यांच्या मधुर वाणीतून विठ्ठल रखुमाईच्या अभिषेक सोहळा संचालक संजय माने यांनी सपत्नीक केला. सायंकाळी परंपरेनुसार येथील भजनी मंडळाकडून आयोजित करण्यात आलेल्या नगर प्रदक्षिणा दिंडीला ५ वाजता सुरुवात झाली. दिंडीपूर्वी मंदिराच्या सभागृहात महिला – पुरुष भजनी मंडळाच्या वतीने भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला.


शेकडो वर्षाची परंपरा कायम ठेवत मंदिर समितीच्या पुढाकारातून विठू नामाचा गजर करीत, टाळ – मृदंगाच्या वाणीत नगरप्रदक्षिणा दिंडी काढली. शहर व बाहेरील सर्व मंदिरातील देवी – देवतांचे दर्शन घेऊन पंढरपूर यात्रेला गेल्याचा काहींसा अनुभव दिंडीत सामील झालेल्यां भाविकानी घेतला. भर पावसातही टाळ -मृदंगाच्या गजरात व भजनी मंडळाच्या आवाजाने शहरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. नगर प्रदक्षिणा परत मंदिरात आल्यानंतर भजन गीते व प्रसाद वाटपाने दिंडीचा समारोप करण्यात आला.



नगरपंचायत प्रशासनाच्या नाकर्तेपणा आणि ढिसाळ नियोजन
पाणी पुरवठा योजनेच्या नावाखाली खोदून ठेवल्याने शहरातील रस्ते खड्डेमय आणि चिखलमय झाले आहेत. या खड्डेमय घाण पाण्यात चिखलात रुतलेल्या रस्त्याने नगरप्रदक्षिणा दिंडीला जावे लागले आहे. त्यामुळे दिंडीत सामील झालेल्या महिला – पुरुष भाविकांनी नगरपंचायत प्रशासनाच्या नाकर्तेपणा आणि ढिसाळ नियोजनाच्या बाबतीत तीव्र संताप व्यक्त केला आहे. आगामी काळातील सण उत्सवाची रेलचेल लक्षात घेता धार्मिक कार्यक्रमात अडथळा निर्माण होणार नाही यासाठी रस्ते चिखल आणि खड्डेमुक्त करावे अशी मागणी केली आहे.

