Wednesday, May 13

Triratnakumar Bhavare : त्रिरत्नकुमार भवरे कलाभूषण पूरस्काराने सन्मानित

नांदेड| बहुजन टायगर युवा फोर्सचे संस्थापक अध्यक्ष आणि लोकपारंपारिक कलावंताच्या न्याय व हक्कासाठी सदैव कर्तव्यतत्पर व्यक्तिमत्व म्हणून सुपरिचित असलेले त्रिरत्नकुमार भवरे यांना कलाभूषण पुरस्काराने आज सन्मानित करण्यात आले.

पिएफसी संस्था मुखेड व शाहीर महर्षी आत्माराम पाटील शाहीर मंचच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज व राष्ट्रसंत गाडगे महाराज जयंती आणि शाहीर आत्माराम पाटील जन्मशताब्दी वर्षांनिमित्त सुजलेगांव ता.नायगांव (खै.) येथे आज दि.२४ फेब्रुवारी रोजी आयोजित कार्यक्रमात सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील उत्तुंग योगदानासाठी त्रिरत्नकुमार मारोतीराव भवरे कामारीकर यांना कलाभूषण पुरस्कार देऊन नांदेडचे लोकप्रिय खा.रविंद्र वसंतराव चव्हाण यांच्या शुभहस्ते सन्मानित करण्यात आले.

यावेळी जेष्ठ नेते माधवराव पाटील शेळगांवकर,जिल्हा परिषदेचे माजी सभापती शिवराज पाटील होटाळकर, युवानेते राजेश गंगाधरराव देशमुख कुंटूरकर, संयोजक दिगु तुमवाड,चेअरमन हणमंतराव पाटील,सरपंच दत्तात्रय आईलवार,माजी सरपंच सूधाकर बकवाड आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

त्रिरत्नकुमार भवरे यांचे सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य असून बहुजन टायगर युवा फोर्स या सामाजिक संघटना व त्यांच्या सांस्कृतिक विभाग तसेच, पारंपरिक शाहीर लोककला संवर्धन मंडळाचे संस्थापक अध्यक्ष व सा.वारसदार आणि सा.वृत्त वारसदारचे मुख्य संपादक म्हणून कार्यरत असून या माध्यमातून ते सामाजिक चळवळीत आणि लोकपारंपारिक कलावंतांच्या न्याय व हक्कासाठी सदैव कर्तव्यतत्पर असतात. कलावंतांच्या मानधनासह त्यांचे विविध प्रश्न निवारणासाठी प्रयत्नशील असतात.

मान्यवर वृद्ध कलावंत व साहित्यिक यांच्या मानधनातील नुकतीच झालेली वाढ असो वा कोरोना महामारीच्या कालावधीत कलावंतांना शासनाकडून मिळालेली आर्थिक मदत यासाठीही प्रसंगी आत्मक्लेष आंदोलनातून आक्रमकपणे लढा उभारुन त्यांनी प्रयत्न केलेले आहेत. महत्वाचे म्हणजे भारतीय संस्कृतीत सांस्कृतिक कार्यक्रम व विविध उपक्रमांतून समाजप्रबोधन करणारी लोककला कायम जतन ठेवण्यासह शहरी व ग्रामीण कलावंतांना एकत्रित आणून त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठीच लोकपारंपारिक कलावंत व शाहीरांचे ते दरवर्षीच भव्य मेळावेही आयोजित करतात.

त्यात महाराष्ट्रासह तेलंगणा, आंध्रप्रदेश व कर्नाटक आदी लगतच्या प्रदेशातील कलांवतही प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवितात.सर्वच समाजघटकांतील जेष्ठ,नवख्या लोकपारंपारिक कलांवतांचे हक्काचे एकमेव व्यासपीठ आणि कणखर नेतृत्व म्हणून त्यांनी सर्वदूर ओळख निर्माण केलेली असल्यानेच त्यांच्या आजपर्यंतच्या कार्याची दखल घेऊन त्यांना कलाभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आल्याबद्दल त्यांचे सर्वस्तरातून कौतुक व अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!