नांदेडमहाराष्ट्र

Difficulties reduced :अडचणी कमी झाल्या, आत्मनिर्भरतेच्या वाटा रुंदावल्या…NNL

नांदेड| राज्याचा मुख्यमंत्री आमचा भाऊ आहे, तो आमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, याचा आम्हाला खुप आनंद आहे. रोजच्या दिवसाला सुरुवात करतांना अनेक अडचणी यायच्या, मोलमजूरी करून घर चालवतांना ओढाताण व्हायची, पण मुख्यमंत्री लाडक्या बहीण  योजनेतून दर महिन्याला दीड हजार रुपये मिळू लागले आणि आमच्या संसाराला हातभार  लागला, आमच्यासाठी दर महिन्याला ही मिळणारी दीड हजाराची रक्कम खुप मोलाची असल्याची भावना  मुख्यमंत्र्यांच्या बहिणींनी व्यक्त केली..

13 ऑक्टोबरला महिला सशक्तीकरण कार्यक्रमांतर्गत नांदेड येथे “मुख्यमंत्री  माझी लाडकी बहीण” उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने  जिल्हा भरातील महिलांच्या प्रतिक्रिया घेण्यात आल्या. यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज सवलत  योजना, मुलींना मोफत उच्च शिक्षण  योजना अशा विविध योजनांनी आम्हा सर्वसामान्यांच्या प्रगतीतील अडथळे दूर झालेच परंतू आमच्या आत्मनिर्भरतेच्या वाटा रुंदावल्याचा आनंद योजनांच्या लाभार्थ्यांनी व्यक्त केला.  

आपल्यासाठी दर महिन्याला मिळणारी 1500 रुपयांची रक्कम किती मोलाची आहे हे सांगतांना अनेकजणींच्या डोळ्यात पाणी तरळले… काही मुलींनी आपण यातून स्पर्धा परिक्षेची पुस्तकं खरेदी करणार असल्याचे  सांगितले तर काही जणींनी मिळणारे पैसे साठवून छोटा मोठा व्यवसाय सुरु करण्याचा मनोदय व्यक्त केला.  

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना…प्राथमिक गरजा पूर्ण झाल्या…

कृष्णूरच्या मनिषा महादेव कानोडे यावेळी म्हणाल्या की, मी रोज कामाला जाते. मिळणाऱ्या पैशातून महिन्याचा खर्च भागवणे कठीण होत होते. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे तीन हप्ते मला एकदम मिळाले… त्यामुळे मला खुप मोठा आधार मिळाला…किनवटच्या सुमित्रा मागुडकर, लक्ष्मी बोलेनवार म्हणाल्या योजनेतून मिळालेल्या पैशातून आम्हाला संसारातील प्राथमिक गरजा भागवत्या आल्या…

चहाच्या दुकानातून स्वरोजगार…

माहूर येथील रेखा विजय भगत यांनी तर लाडकी बहीण योजनेतून मिळालेल्या निधीतून चहाचे छोटे दुकान सुरु केले आहे. या व्यवसायातून त्यांच्या उत्पन्नाचा मार्ग प्रशस्त झाला असून त्यातून घरखर्चाला मोठा हातभार मिळाला असल्याने त्यांनी शासनाचे आभार मानले आहेत.

छोटा गृह उद्योग मोठा करणार

कांचन कांनदे आणि आरती कानंदे या दोन जावांनी लाडकी  बहीण योजनेतून मिळालेल्या पैशात छोटा गृह उद्योग सुरु केला. यातून जो नफा होईल त्यातून आम्ही दोघी व्यवसाय वाढवणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला तशीच यापुढेही आमच्या या लाडक्या भावाने, मुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला अशीच मदत करावी अशी विनंतीही केली.

सख्ख्या भावासारखा हा भाऊ…

माहूरची कल्पना श्रीराम पवार नावाची महिला  ॲलर्जी असल्याने उन्हात काम करू शकत नाही.. त्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून माहुरला पानाचा ठेला सुरु केला..त्यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले असून सख्या भावासारखा माझा हा भाऊ, राज्याचा मुख्यमंत्री, माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याची भावना व्यक्त केली.

योजना झाली जगण्याचा आधार

शुभांगी डोईफोडे  या रोज मोलमजुरी करून जगणाऱ्या महिलने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे एकदम मिळालेले तीन हप्ते म्हणजे ४५०० रुपयांची रक्कम आपल्या तीन मुलींच्या प्राथमिक गरजा भागवण्यासाठी खर्च केल्याचे सांगितले. माझ्यासारख्या गरीब बहिणींसाठी ही योजना जगण्याचा मोठा आधार असल्याचे त्या म्हणाल्या..

स्पर्धा परिक्षा देऊन यशस्वी होणार

माहूर येथील पायल राहूल पवार या विद्यार्थीनीने  मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या तीन महिन्यांच्या पैशातून चक्क महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परिक्षेची पुस्तके खरेदी केली. पुढच्या महिन्यात मिळणाऱ्या पैशातून मी परिक्षेची फी भरून परीक्षा देणार आणि यशस्वी होणार असा विश्वासही बोलून दाखवला…

मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज सवलत पैसे वाचले… इतर खर्च भागवणार

मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजनेत शेतकऱ्यांचे वीज बिल माफ केल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला आहे.  त्यांनी महाराष्ट्र शासनाचे आभार मानले आहेत.

अर्धापूर तालुक्यातील चोरांबा गावच्या नर्मदाबाई गोपाळ बैगनवाड म्हणाल्या की, पहिले आम्हाला वीज ब‍िल जास्त येत होते. आता मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज सवलत योजनेमुळे वीज बिल माफ झाले आहे. त्यामुळे थोडे पैसे गाठीशी उरायला लागले आहेत. या पैशामधून आम्ही खत, बि-बियाणे खरेदी करु शकत आहोत. आमच्या मुला-बाळासाठी, नातवंडाच्या शिक्षणासाठी पैसे खर्च करीत आहोत. आता मोफत वीज  झाल्यामुळे संसाराचा गाडा सुरळीत सुरु आहे.

लेकराबाळासाठी खर्च करता येऊ लागला…

पहिले लाईटबील जास्त येत असे ते भरल्यानंतर आमच्याकडे कमी पैसे उरत. यामुळे शेती व्यवसायात पाहिजे तेवढा नफा होत नव्हता. आता मात्र वीज बिल मोफत झाल्यामुळे आमच्या लेकरा बाळासाठी पैसे खर्च करण्यासाठी उरत आहेत अशी प्रतिक्रिया कौशल्याबाई नरोटे  राहणार चोरंबा यांनी दिली.   

आमच्या शेतात पहिले पाण्याची व्यवस्था होती. वीज बिल जास्त येत असल्यामुळे आम्ही पहिले शेती करु शकत नव्हतो. मोफत वीज केल्यामुळे चांगल्या प्रकारे शेती करीत आहोत. त्या पैशातून मुलांसाठी, शिक्षणासाठी पैसे खर्च करीत आहोत त्यामुळे आम्ही महाराष्ट्र शासनाचे आभारी आहोत अशी प्रतिक्रिया कविता कानोडे यांनी दिली.

मुलींना मोफत उच्च शिक्षण

मुलींच्या उच्च शिक्षणाची पूर्ण फीस माफ झाल्याने  गावखेड्यातील गरजू विद्यार्थिंनींच्या उच्च शिक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे.. केवळ पैसे नाहीत म्हणून पुढचे शिक्षण नाही असं होत होतं. आता हा अडसर दूर झाल्याने मुलींच्या उच्च शिक्षणाचा टक्का नक्कीच वाढेल असा विश्वास योजनेचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थिनी आणि पालकांकडून व्यक्त करण्यात आला. यामुळे मुली उच्च शिक्षण घेऊन मोठया पदावर नोकरी  करू शकतील, योजनेने मोठा दिलासा दिल्याचेही ते म्हणाले. त्यांनी यासाठी महाराष्ट्र शासनाचे खूप आभार मानले आहेत.

माझं ध्येय नक्की गाठणार

मुलींना उच्च शिक्षण मोफत केल्याने माझे पुढे शिकण्याचे स्वप्नं पुर्णत्वाला जाणार असून खुप शिकून मोठ्ठं होण्याचं माझं ध्येय मी नक्की पुर्ण करणार असल्याचे नांदेडच्या सीमा पावडे या बीएड द्वितीय वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थिनीने सांगितले. तिनेही मुख्यमंत्र्यांचे या योजनेसाठी आभार मानले.. नम्रता जाधव, शासकीय अध्यापक महाविद्यालयात द्वितीय वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनीने उच्च शिक्षणात 100 टक्के फीस माफ केल्यामुळे गरीब घरातील मुलींना शिक्षण मिळेल. शासनाच्या या निर्णयामुळे गोरगरीब घरातील मुली उच्च शिक्षण घेवून विकासाच्या मुख्य प्रवाहात येण्यास मदत होईल असा विश्वास व्यक्त केला.  ग्रामीण भागातील मुली उच्च शिक्षण घेतील व स्वत: च्या पायावर उभ्या राहतील. हा महाराष्ट्र शासनाने घेतलेला खुपच छान निर्णय असून मी त्याचे स्वागत करत असल्याचेही ती म्हणाली.  

शिक्षणातील भेदभाव कमी होईल

महात्मा गांधी बीएड महाविद्यालयात द्वितीय वर्षात शिक्षण घेणाऱ्या शेख दस्तगीर या विद्यार्थीनीने सांगितले की, शासनाने मुलींना उच्च शिक्षण मोफत केल्याने खुप मुलींचा पुढच्या शिक्षणाचा मार्ग मोकळा झाला. आजही गावपातळीवर शिक्षण घेतांना मुला-मुलीत काही प्रमाणात भेद जाणवतो, मुलांच्या शिक्षणाला प्राधान्य दिले जाते… मुलीचे शिक्षण मध्येच कुठंतरी थांबते, यासाठी पालकांचे कमी असणारे उत्पन्न हे एक महत्वाचे कारण आहे… अशा स्थितीत या योजनेमुळे मुलानाच नाही तर मुलींनाही पालक उच्च शिक्षण देतील, पुढं शिकवतील..

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button