किनवट, परमेश्वर पेशवे| किनवट शहरातील जुन्या नगर परिषदेचे प्रांगण आणि समोरच्या रस्त्यावर नेहमीच मोकाट गुरं, गाढवांचा आखाडा तर आहेच शिवाय गाड्या पार्कींगची व्यवस्था नसल्यामुळे दुकानांसमोर रस्त्याच्या दोन्ही बाजुंनी गाड्या लावल्यामुळे रस्त्यावर लोकांची कोंडी होत आहे. तहसिल चौकातही यापेक्षा भयावह स्थिती आहे. नगर परिषद आणि पोलीस प्रशासनाने यावर तोडगा काढून वाहनांची कोंडी होणार नाही अशी कार्यवाही करावी, अशी त्रस्त झालेल्या नागरीकांची मागणी आहे.


शहराच्या मध्यभागी व्यापारपेठेतील छ.शिवाजी महाराज पुतळा चौक, स्टेट बॅंक आॅफ इंडिया, पोस्ट आॅफीस, बसस्थानक परिसर, अशोकस्तंभ, तहसिलचौक अशा लोकवर्दळीच्या ठिकाणीच नेमका ज्यांना वाली नाही अशी गुरं आणि ज्यांना वाली असूनही लावारीश सोडलेल्या गाढवांचा आखाडा आहे. आता या जनावरांपासून प्रत्येकांना त्रास सहन करावा लागतो. यांना थांबण्याची नगर परिषदेने व्यवस्था करायला हवी. शिवाय त्यांच्या चारापाण्याची सोय केल्यास त्यांचा रस्त्यावरचा थांबा कमी होईल. त्यांच्या पोटापाण्याची व्यवस्था नसल्यामुळे कदाचित ते मार्केटमधिल रस्त्यावर प्लास्टीक पिशव्या, कागदं, कचरा खाण्यासाठी रस्त्यावर गर्दी करतात.


रस्त्यात जनावरांचा र्हावा आणि त्यातच अधिकची भर म्हणून रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या दुकानांच्या समोर दुकानदारांच्या सामानाचे अतिक्रमन आणि वाहनांना पार्कींगची व्यवस्था नसल्याने दुकानांसमोरच वाहनांच्या रांगा. त्यामुळे दोन आॅटोरिक्षे जातील एवढाही रस्ता नसतो. वाहनांची कोंडी होते. लोकांना पायीसुद्धा चालतांना तारेवरची कसरत करावी लागते. याचा कोणी वाली आहे की नाही ? असा सवाल उठणे स्वाभाविक आहे.



प्रभारी प्रशासक मुख्याधिकारी मुगाजी काकडेंनी परवाच अतिक्रमन हटवलेल्या चौकात पुन्हा दररोज दुपारनंतर ढकलगाड्यांच्या रांगा लावल्या जात आहेत. त्या गाड्यावाल्यांना प्रशासनाने जागा निश्चीत करुन दिल्यास रस्त्यावर अतिक्रमन होणार नाही. पुन्हा कोणी अतिक्रमन करीत असेल तर त्यांच्यावर कारवाई केली जावी, असा सूर ऐकायला मिळतो.
