नांदेड| शाळा भरण्याच्या आणि सुटण्याच्या वेळेत भरधाव वेगाने धावणाऱ्या वाहनांमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. विद्यार्थ्यांचे अपघात टाळण्यासाठी नांदेड शहरासह सिडको-हडको परिसरातील प्रत्येक शाळेसमोर दोन गतिरोधक तातडीने बसवावेत, अशी मागणी शिवसेना ओबीसी-बारा बलुतेदार विभागाचे राज्य संपर्कप्रमुख अनिल पाटील धमने यांनी केली आहे.


याबाबत त्यांनी जिल्हाधिकारी, नांदेड महानगरपालिका आयुक्त तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना दि. २३ जुलै रोजी निवेदन दिले. सिडको-हडको परिसरातील इंदिरा गांधी हायस्कूल, शिवाजी विद्यालय, छत्रपती शिवाजी विद्यालय, कुसुमताई हायस्कूल, संतोष कन्या प्राथमिक शाळा यांसह मुख्य रस्त्यांलगत असलेल्या अनेक शाळांसमोर वाहने भरधाव वेगाने धावत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.


पालकांची चिंता वाढली – शाळा भरण्याच्या आणि सुटण्याच्या वेळेत रस्त्यांवर वाहनांची मोठी वर्दळ असते. मात्र, काही वाहनचालक निष्काळजीपणे भरधाव वेगाने वाहन चालवितात. अचानक ब्रेक लावणे, कर्णकर्कश हॉर्न वाजवणे यामुळे विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.



“एखाद्या निष्पाप विद्यार्थ्याचा जीव गेल्यानंतर प्रशासन जागे होण्याची वाट पाहू नये,” अशी भूमिका अनिल पाटील धमने यांनी मांडली आहे. प्रत्येक शाळेसमोर दोन गतिरोधक उभारल्यास वाहनांच्या वेगावर नियंत्रण येऊन अपघातांचा धोका कमी होऊ शकतो, असे त्यांनी सांगितले.
दुर्घटना घडल्यास प्रशासन जबाबदार?
शाळांच्या परिसरात विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना करणे प्रशासनाची जबाबदारी आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन, मनपा आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे तातडीने लक्ष द्यावे. भविष्यात शाळेसमोर भरधाव वाहनामुळे विद्यार्थ्यांसोबत दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी प्रशासनाची राहील, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी वैयक्तिक लक्ष घालून नांदेड शहरातील प्रत्येक शाळेसमोर तातडीने गतिरोधक बसवावेत, अशी मागणी अनिल पाटील धमने यांनी केली आहे.

