नांदेड| प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम सन २०२६ अंतर्गत पिक विमा भरणे चालू असून आज रोजी पर्यंत १ लाख ६५ हजार ३५१ शेतकऱ्यांनी २ लाख ८८ हजार ५०७ विमा अर्ज दाखल केले असून १ लाख ८६ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचा विमा उतरविला आहे. पिक विमा नोंदीची अंतिम तारीख ३१ जुलै २०२६ आहे.


यंदा जिल्ह्यात पाऊस कमी आहे सध्या अनेक भागात पावसाचे नितांत गरज आहे. पुढील काळातही कमी पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे याचा परिणाम खरिपातील पिकांवर होत आहे. उत्पादनात घट येण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत पिक विमाची संरक्षण गरजेचे पिक विमा भरण्याची अंतिम दिनांक ३१ जुलै २०२६ असुन यामध्ये कोणत्याही प्रकारची मुदतवाढ मिळणार नाही. शेवटच्या दिवसांची वाट न बघता ज्या शेतकऱ्यांना पिक विमा योजनेमध्ये सहभागी व्हायचे आहे त्यांनी लवकरात लवकर सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे.


मागील काही वर्षांचा अनुभव बघता पिक विमा नोंदणीच्या शेवटच्या हप्त्यामध्ये शेतकऱ्यांची गर्दी होते परिणामी पिक विमा पोर्टलवर प्रचंड ताण येऊन पोर्टल हळू होते किंवा पिक विमा भरतांना अडचणी येतात, त्यामुळे सर्व शेतकरी बाधवांनी पिक विमा नोंदणीच्या अंतिम मुदतीची वाट न बघता आपले जवळचे ग्राहक सेवा केंद्रामध्ये, बँकेमध्ये किंवा स्वतः शेतकरी यांनी पिक विमा पोर्टलवर पिक विमा उतरवून घ्यावा.



पिक विमा नोंदणी ग्राहक सेवा केंद्रामध्ये विनाशुल्क केल्या जाते तेसच फार्मर आयडी अनिवार्य आहे. त्यामुळे शेतकरी बंधुनी शेतकरी विमा हप्त्याव्यतिरिक्त ज्यादा रक्कम शुल्क म्हणून ग्राहक सेवा केंद्र चालकास देऊ नये. तसेच ग्राहक संवा केंद्रामध्ये सी.एस.सी. लॉग इन मधून पिक विमा नोंदणी करतांना अडचणी येत असल्यास शेतकऱ्यांनी पिक विमा पार्टलवर शेतकरी लॉग इन मधुन पिक विमा नोंदणी करावी.
तसेच ज्या सर्व्हे नंबरसाठी व क्षेत्रासाठी पीक विमा काढण्यात आलेला आहे, त्या क्षेत्राच्या ७/१२ उताऱ्यावर शेतकऱ्याचे नाव नसणे, बोगस ७/१२ व पीक पेरा नोदीच्या आधारे पीक विम्याची बोगस प्रकरणे करणे, दुसऱ्या शेतकऱ्याच्या संस्थेच्या क्षेत्रावर बोगस भाडेकरारद्वारे योजनेत सहभाग घेणे, विहित भाडेकरार न करता परस्पर विमा उतरवणे अशा बाबी निदर्शनास आल्यास अशा प्रकरणात सबंधित दोषर्षीवर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल. तसेच, महसूल दस्तऐवजामध्ये फेरफार करून शासनाचे फसवणूकीच्या प्रयत्नाबाबत गुन्हे दाखल करण्यात येतील.
बोगस किंवा फसवणूकीच्या उद्देशाने विमा घेतल्याचे आढळून आल्यास, संबंधित अर्जदारास पीक विमा योजना, नमो शेतकरी महासन्मान योजनेसारख्या DBT द्वारे लाभ देण्यात येणाऱ्या कृषि विभागाच्या योजनांचा लाभ घेण्यापासून पाच वर्ष बंदी घालण्यात येईल. तसेच विमा कंपनीचा सुधारीत टोल फ्री क्रमांक १४४४७ हा आहे कृपया याची सर्व विमाधारक शेतकरी बंधुनी नोंद घ्यावी
