नांदेड | जिल्हा परिषद शिक्षक सुनील मोरे यांनी आपल्या दोन चिमुकल्या मुलांसह गोदावरी नदीत कारसह आत्महत्या केल्याच्या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ अटक करावी, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे स्थानिक नेते प्रकाश मारावार यांनी केली आहे.


हदगाव तालुक्यातील पोटा येथील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत असलेले शिक्षक सुनील मोरे यांनी दोन मुलांसह गोदावरी नदीत आत्महत्या केली. ही घटना अत्यंत दुर्दैवी असून शिक्षण क्षेत्राला काळिमा फासणारी आहे, अशी प्रतिक्रिया मारावार यांनी व्यक्त केली.


मृत्यूपूर्वी सुनील मोरे यांनी सोशल मीडिया स्टेटसमध्ये काही शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांकडून कथित मानसिक, शारीरिक व प्रशासकीय त्रास होत असल्याचा उल्लेख केल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर हदगावचे गटशिक्षणाधिकारी किसन फोले आणि शिक्षण विस्तार अधिकारी सूर्यकांत बाचे यांची भूमिका तपासून, दोष आढळल्यास त्यांना तात्काळ अटक करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.



एका शिक्षकाने आपल्या दोन चिमुकल्या मुलांसह टोकाचे पाऊल उचलणे ही गंभीर बाब आहे. या घटनेमागे केवळ वैयक्तिक कारणे न शोधता, मृत्यूपूर्वीच्या स्टेटसमधील आरोपांचीही सखोल चौकशी होणे गरजेचे आहे, असे मारावार यांनी म्हटले.
या प्रकरणाची डीवायएसपी दर्जाच्या अधिकाऱ्यामार्फत उच्चस्तरीय व निष्पक्ष चौकशी करावी. तसेच शिक्षण विभागातील इतर शिक्षकांनाही अशाच प्रकारे मानसिक किंवा प्रशासकीय त्रास दिला जात आहे का, याची स्वतंत्र चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी प्रकाश मारावार यांनी केली आहे. दरम्यान, संबंधित अधिकाऱ्यांवरील आरोपांची सत्यता तपासातूनच स्पष्ट होणार असून, दोषी आढळणाऱ्यांवर कायद्यानुसार कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
