देगलूर, गंगाधर मठवाले| देगलूर नगरपरिषदेतील राजकीय समीकरणे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या बदलाच्या उंबरठ्यावर आहेत. माजी नगराध्यक्ष मोगलाजी ईरन्ना शिरशेटवार यांच्या अध्यक्षतेपासून आजपर्यंत काँग्रेस पक्षाने आपले वर्चस्व टिकवून ठेवले असून, सध्या नगरपरिषदेत काँग्रेसचे पारडे स्पष्टपणे जड असल्याचे दिसून येत आहे.


गेल्या निवडणुकीत अध्यक्षपद सर्वसाधारण गटासाठी आरक्षित होते. त्या वेळी झालेल्या सरळ लढतीत काँग्रेसचे मोगलाजी शिरशेटवार यांनी लक्ष्मीकांत पदमवार यांचा पराभव करून नगरपरिषदेच्या अध्यक्षपदावर कब्जा केला होता.

त्या वेळी नगरपरिषदेत एकूण 25 नगरसेवक होते, त्यापैकी बहुमत काँग्रेसकडे होते. अध्यक्ष मोगलाजी शिरशेटवार आणि उपाध्यक्ष बालाजी टेकाळे यांच्यासह सुशील देगलूरकर, आलीमुन्निसा सय्यद, योगेश्वरी तोटावार, महमूद शेख, जयश्री काब्दे, अनिल बोन्लावार, कमलबाई वानखेडे, शैलेश उल्लेवार, महानंदा पाटील आणि राधिका आडिशेरलावार हे नगरसेवक काँग्रेसकडून निवडून आले होते.


तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनिता मैलागीरे, अविनाश निलमवार, मनोरमाताई निलमवार, निसार अहमद, तुळशीराम संगमवार, शब्बीरबी कुरेशी, मीनाक्षी कांबळे, अंकुश देशाई, उज्वलाताई पदमवार, बालराज माळेगावकर आणि कल्पनाताई रोयलावार हे सदस्य होते. याशिवाय प्रशांत दासरवार आणि अर्चना गंदपवार हे दोन नगरसेवक भाजपकडून निवडून आले होते.

दरम्यान, काँग्रेसच्या एका नगरसेवकाचे निधन झाल्यानंतर नगरपरिषदेच्या राजकारणात बदल घडला. विशेष म्हणजे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे 8 नगरसेवक काँग्रेसमध्ये प्रवेशले आहेत. त्यामुळे नगरपरिषदेत आता काँग्रेस पक्षाचे संख्याबळ अधिक मजबूत झाले आहे. प्रशासनाच्या नव्या प्रभाग रचनेनुसार येणाऱ्या नगरपरिषदेत 27 नगरसेवक आणि जनतेतून निवडला जाणारा नगराध्यक्ष असणार आहे. यामुळे आगामी निवडणूक आणखी चुरशीची होणार आहे.
देगलूर तालुक्यातील राजकीय इतिहास पाहता, काँग्रेसचा प्रभाव कायम राहिलेला दिसतो. 2016 च्या जिल्हा परिषद निवडणुकीत 4 जागा काँग्रेसकडे तर 1 जागा भाजपकडे होती. तसेच पंचायत समितीच्या दहा गणांपैकी आठ ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार निवडून आले होते, ज्यामुळे स्थानिक पातळीवरही पक्षाचे वर्चस्व स्पष्ट होते.
राजकीय जाणकारांचे मत आहे की, राष्ट्रवादी काँग्रेसमधील नगरसेवकांचा काँग्रेसमध्ये प्रवेश हा भाजपसाठी मोठा धक्का आहे. आगामी नगरपरिषद निवडणुकीत काँग्रेस आणि भाजप यांच्यात सरळ चुरशीची लढत अपेक्षित असली तरी, सध्याच्या घडीला काँग्रेसचा प्रभाव निर्णायक ठरू शकतो.

