
हदगाव, शेख चांदपाशा| हदगाव विधानसभा क्षेत्राचे आ. बाबुराव कदम कोहळीकर यांनी मागील महीण्यात पार पडलेलया अर्थसंकल्पीय अधिवेशनच्या पार्श्वभूमीवर राज्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांची भेट घेऊन हदगाव एस.टी. आगारा साठी नवीन बस देण्याची मागणी केली होती. मात्र, अद्यापही या मागणीची पूर्तता झालेली नाही.


हदगाव आगारात एका ही नवीन बसची भर पडलेली नाही, ही वस्तुस्थिती आहे. दुसरीकडे, नांदेड जिल्ह्यातील काही डेपोला नवीन बसेस प्राप्त झाल्याची माहीती आहे. त्यामुळे हदगाव एस टी आगार ला वगळले गेले का…? असा सवालही नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे. या संदर्भात मा. आमदार यांनी संबंधित परिवहन वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे चौकशी करून तातडीने नवीन बसेस देण्यात याव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

हदगाव आगारातील अनेक बसेस ना दुरुस्त असून, विशेष म्हणजे काही गावे अजूनही एस.टी.च्या सेवांपासून वंचित आहेत. शालेय कॉलेज विद्यार्थ्यांना व वयोवृद्धांना तसेच महिलांना एसटी ने प्रवास करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. बसेस वेळेवर न मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत आहे. वारंवार बसेस बंद पडल्यामुळे प्रवाशांचा वेळही वाया जात आहे. याच पार्श्वभूमीवर मा. आ. बाबुराव कदम कोहळीकर यांनी २६ मार्च २०२५ रोजी परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांची भेट घेऊन नवीन बसेससंदर्भात निवेदन दिले होते.


त्यावेळी विद्यमान मंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच योग्य पावले उचलण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, अद्याप प्रत्यक्ष कृती न झाल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. दरम्यान, हदगाव शहरातील एस.टी. आगाराचे प्रमुख धर्माधिकारी यांनी माहिती देताना सांगितले की, “सध्या हदगाव आगारात नवीन बसेस आलेल्या नाहीत. मात्र,आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सतत संपर्क साधला जात आहे. आणि लवकरच नवीन बसेस मिळतील, असा आशावाद प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केला आहे. नागरिकांना आशा आहे की, त्यांच्या मागणीकडे गांभीर्याने लक्ष दिले जाईल आणि हदगाव आगारात लवकरच नवीन लालपरी धावू लागेल.




