
नांदेड| येथील ‘स्वरमेघ म्युझिक कल्चर’ च्या वतीने आयोजित ‘तेरे सूर और मेरे गीत’ या सांगितिक कार्यक्रमास रसिक प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्वरसम्राज्ञी भारतरत्न स्वर्गीय लता मंगेशकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ येथील कुसुम सभागृहात प्रसिद्ध गायिका मेघा संजीवन यांच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.


कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्रमुख अतिथी नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप, नांदेड उत्तरचे शिवसेना आमदार बालाजीराव कल्याणकर यांच्यासह मान्यवरांच्यावतीने स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी नांदेड दक्षिणचे आमदार आनंदराव पाटील बोंढारकर, माजी राज्यमंत्री डी. पी. सावंत, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा यांच्यासह इंजिनीयर माधवराव एकलारे, इंजिनियर शामसुंदर शिंदे, डॉ. सिद्धार्थ जोंधळे, माय हॉलिडेजचे संदीप मैंद, विठ्ठल सावजी, प्रभाकर टाक धानोरकर यांचीही उपस्थिती होती.


या कार्यक्रमाच्या निर्मात्या तथा प्रसिद्ध गायिका मेघा संजीवन यांच्यासह मुंबईहून आलेले खास गायक के. शिरीष, गिरीश डोईफोडे यांच्यासह दैनिक गोदातीर समाचारचे संपादक केशव घोणसे पाटील, इंजिनीयर जयचंद्र तत्तापूरे, डॉ. हंसराज वैद्य, अतुल कौटकर, राजेंद्र हुरणे, रमेश नागुलवार यांनी विविध चित्रपटातील अप्रतिम गीते सादर करीत रसिक प्रेक्षकांची दाद मिळविली.


लतादीदींची अजरामर गीते आणि शास्त्रीय संगीताचा साज
गायिका मेघा संजीवन यांनी 1961 ते 2002 या काळातील लतादीदींची अजरामर गीते सादर करून रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. शास्त्रीय संगीताच्या गायिका असणाऱ्या मेघा संजीवन यांनी गायलेली ‘अलबेला सजन आयो रे’, ‘तुही रे’ अशी काही शास्त्रीय बाज असणारी गाणी रसिकांनी अक्षरशः डोक्यावर घेतली.


मेघा संजीवन यांच्या ‘मेडली’ अर्थात मिश्र गीतांनंतर दैनिक गोदातीर समाचार चे संपादक केशव घोणसे पाटील यांनी स्वरमेघ म्युझिक कल्चरचे थीम सॉंग असलेले ‘मेघा रे, मेघा रे’ हे युगलगीत गायिका मेघा संजीवन यांच्यासहित सादर करून सर्वांनाच आवाक केले. यानंतरही त्यांनी इतर गायलेली दोन गीते आणि इतर सर्वच गायकांसमवेत गायिलेले समारोपाचे ‘चलते चलते, मेरे ये गीत याद रखना’ हे गीत रसिकांची दाद मिळवून गेले.
देश विदेशात सन्मानित मुंबई येथून आलेले गायक के. शिरीष आणि गिरीश डोईफोडे यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या सादर केलेल्या गीतांनी कार्यक्रमात बहार आणली. अतुल कौटकर यांची शास्त्रीय बाजाची गाणी, इंजिनीयर असणारे जयचंद्र तत्तापुरे यांनी गायलेली विविध गाणीही रसिक प्रेक्षकांना चांगलीच भावली.
या संपूर्ण कार्यक्रमात नाशिकहून खास आलेले मनोज गुरव यांच्या बासरीची धून कार्यक्रमात वेगळाच उत्साह आणि चैतन्य निर्माण करीत होती. अमर वानखेडे (छत्रपती संभाजीनगर), शेख नईम, रतन चित्ते, किशोर आवटे, सिद्धोधन कदम, स्वप्निल धुळे, राहुल जमदाडे यांनी संगीताची दिलेली अप्रतिम साथ कार्यक्रमाला एका वेगळ्या उंचीवर घेऊन गेली. गट्टाणी यांच्या ध्वनी व्यवस्थेचीही त्याला उत्कृष्ट साथ लाभली. या कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन निवेदक मुरलीधर हंबर्डे यांनी केले. कार्यक्रमाचे संयोजक संजीवन गायकवाड यांनी शेवटी आभार प्रदर्शन केले.



