नांदेड,अनिल मादसवार| गणेशोत्सव, दहीहंडी आणि पोळा यांसह विविध सणांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात शांतता, सौहार्द आणि सर्वधर्मसमभावाचे वातावरण कायम ठेवत उत्सव साजरे करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले. ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी डीजेमुक्त व पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा तसेच गणेश मंडळांनी सामाजिक उपक्रम राबवून समाजाला सकारात्मक संदेश द्यावा, असेही त्यांनी सांगितले.



जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन येथे गणेशोत्सव, दहीहंडी, पोळा व अन्य सणांच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची बैठक जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी आमदार अमर राजूरकर, महापौर कविता मुळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन, अपर जिल्हाधिकारी रत्नदीप गायकवाड, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, मनपा अपर आयुक्त गिरीश कदम, निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर यांच्यासह शांतता समितीचे सदस्य व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.



जिल्हाधिकारी कर्डिले म्हणाले की, गणेशोत्सव काळात कोणालाही त्रास होणार नाही, याची गणेश मंडळांनी काळजी घ्यावी. ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी डीजेचा वापर न करता पारंपरिक पद्धतीने उत्सव साजरा करावा. गणेशमूर्तींचे नदीच्या वाहत्या प्रवाहात विसर्जन न करता कृत्रिम तलावांचा वापर करावा. घरगुती गणेशमूर्तींचे घरोघरी संकलन करण्याबाबतही प्रशासनाने नियोजन करावे. उत्सव काळात नागरिक व गणेश मंडळांच्या अडचणी तातडीने सोडविण्यासाठी प्रशासनाच्या वतीने व्हॉट्सॲप ग्रुप तयार करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. आमदार अमर राजूरकर यांनी शहरात अधिकाधिक कृत्रिम तलावांची निर्मिती करून डीजेमुक्त आणि पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले. महापौर कविता मुळे यांनी पर्यावरणपूरक गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करून पर्यावरणाचा ऱ्हास टाळण्याचे आवाहन केले.




नागरिकांनी कायदा हातात घेऊ नये : पोलीस अधीक्षक – गणेशोत्सव शांततेत आणि सर्वधर्मसमभावाने पार पाडण्यासाठी नागरिकांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे. कोणाच्याही भावना दुखावणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. सोशल मीडियावरील संदेश व पोस्टची सत्यता पडताळून पाहिल्यानंतरच त्यावर विश्वास ठेवावा. उत्सव काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे. नागरिकांनी कोणत्याही परिस्थितीत कायदा हातात घेऊ नये, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी केले. गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी प्रतिबंधात्मक कारवाई आणि आवश्यक नियोजन करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
विसर्जनासाठी मनपाची तयारी – गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेने आवश्यक नियोजन पूर्ण केले आहे. मिरवणूक मार्गावरील अडथळे दूर करण्याबरोबरच विविध ठिकाणी गणेशमूर्ती विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली आहे. निर्माल्य व प्रसादाचे पावित्र्य राखण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था, पथदिवे, विद्युत रोषणाई तसेच विसर्जनासाठी क्रेनची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती मनपा अपर आयुक्त गिरीश कदम यांनी दिली.
बैठकीत शांतता समितीच्या सदस्यांनी गणेशोत्सव व दहीहंडीच्या अनुषंगाने विविध समस्या आणि सूचना प्रशासनासमोर मांडल्या. संबंधित समस्यांचे योग्य नियोजन करून निराकरण करण्यात येईल, असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. सण-उत्सवाच्या काळात शांतता व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी शांतता समितीचे सदस्य, सामाजिक नेते आणि नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

