हिमायतनगर, अनिल मादसवार| श्रावण महिन्यासारख्या पवित्र काळात हिमायतनगर परिसरात एका हरणाची शिकार झाल्याची घटना समोर आल्याने वन्यजीवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. निष्पाप वन्यजीवांची खुलेआम शिकार करून त्यांचे मांस खाल्ले जात असेल, तर अशा शिकाऱ्यांवर वन विभाग नेमकी कोणती कठोर कारवाई करणार, असा सवाल भाजप युवा मोर्चा माजी तालुकाध्यक्ष रामभाऊ सूर्यवंशी यांच्यासह वन्यजीवप्रेमीं सोशल मीडियावर उपस्थित करत आल्याची याप्रकाराची जोरदार चर्चा तालुक्यात होते आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणात केवळ शिकारी करणाऱ्यांवरच कारवाई न करता, त्यांना कोणत्याही प्रकारे संरक्षण अथवा पाठींबा देणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचीही चौकशी करावी, अशी मागणी पुढे येत आहे. “आर्थिक व्यवहारापोटी आरोपींना पाठीशी घातले जात असेल, तर संबंधित अधिकाऱ्यांवरही कारवाई होणार का?” असा थेट प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.



वन्यजीवांची शिकार म्हणजे ‘मर्दुमकी’ नव्हे! – हरणासारख्या वन्यजीवाची शिकार करून त्याचे मांस खाणे ही केवळ क्रूरता नसून, वन्यजीव संरक्षणाच्या दृष्टीने गंभीर बाब आहे. जंगल आणि वन्यजीवांचे संरक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या यंत्रणेने अशा घटनांकडे गांभीर्याने पाहणे अपेक्षित आहे. एकीकडे वन्यजीव संवर्धनासाठी शासनाकडून जनजागृती केली जाते, तर दुसरीकडे शिकारीच्या घटना घडत असतील आणि त्यावर प्रभावी कारवाई होत नसेल, तर वनविभागाच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण होते.




‘एक दिवसाच्या जेवणासाठी आयुष्यभराचा जीव का घ्यायचा?’ एका हरणाच्या मांसासाठी वन्यजीवाचा जीव घेण्याची मानसिकता समाजासाठीही चिंतेचा विषय आहे. शिकार करून मर्दुमकी सिद्ध होत नाही; कायद्याचा आणि निसर्गाचा सन्मान करूनच खरे माणूसपण सिद्ध होते. या घटनेची निष्पक्ष चौकशी करून हरणाची शिकार नेमकी कोणी केली, त्यामागे आणखी कोणाचा सहभाग होता, शिकार केलेल्या वन्यजीवाचे मांस कुठे नेण्यात आले आणि या संपूर्ण प्रकाराची माहिती संबंधित यंत्रणेला कधी मिळाली, याचा तपास होणे गरजेचे आहे.



वनविभाग आता नेमका काय निर्णय घेणार? घटना खरी असेल तर केवळ कागदी पंचनामा करून किंवा किरकोळ कारवाई करून प्रकरण दडपले जाणार नाही ना, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. शिकारींवर कठोर कायदेशीर कारवाईसोबतच, आरोपींना वाचविण्याचा अथवा प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप असल्यास संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांचीही वरिष्ठ पातळीवर चौकशी झाली पाहिजे.
“वन्यजीव मारणाऱ्यांवर कारवाई होणारच; पण त्यांना वाचविणाऱ्यांवर कारवाई कोण करणार?” हा सवाल सध्या हिमायतनगरमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. वनविभाग या गंभीर घटनेची दखल घेऊन तातडीने तपास, दोषींवर कठोर कारवाई आणि संपूर्ण प्रकरणात पारदर्शकता दाखवणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
वनपरिक्षेत्राधिकारी ज्ञानेश्वर धोंगडे म्हणाले : “हरणाच्या शिकारीचा प्रयत्न होतं असलेबाबत रविवारी आम्हाला माहिती मिळाली होती. त्यानंतर आमचे पथक रात्री 7.30 वाजता तातडीने घटनास्थळी गेले. घटनास्थळी जाळे व इतर साहित्य लावलेले आढळून आले. आमचे कर्मचारी तेथे पोहोचताच घटनास्थळावरील दोन-तीन जणांनी तेथून पळ काढला. त्यानंतर आमच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळावरून जाळे व इतर साहित्य जप्त केले. या प्रकरणात एवढीच कारवाई झाली आहे.” अशी प्रतिक्रिया ज्ञानेश्वर धोंगडे, वनपरिक्षेत्राधिकारी, हिमायतनगर

